अर्धा उन्हाळा संपत आला तरी सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा विसर
गेवराई – दि . २८ (प्रतिनिधी ) – वर्षभर विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा डांगोरा पेटवणारे आणि आपल्या नावाच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते लिहिणारे तथाकथित समाजसेवक यांना यंदाचा अर्धा उन्हाळा संपत आला तरी गोरगरीब पददलित, पादचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची पानपोई सुरू करावी या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे . गेवराई शहर व परिसरात जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद खुले करणारे सामाजिक कार्यकर्तेही यावर्षी त्यांना विसर पडला की काय ते दिसत आहे . तसेच गेवराई शहरातील जातेगाव रोड ते जमादारनीचा पूल, पंचायत समिती चौक ते शास्त्री चौक, शास्त्री चौक ते शिवाजी चौक, कोल्हेर रोड , जातेगाव रोड ताकडगाव रोड, मोंढा विभाग आदी भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक – भगिनी मोठ्या प्रमाणावर येऊन या पाणपोईचा वापर करत असतात . परंतु अर्धा उन्हाळा संपत आला आहे तरीसुद्धा एकाही सामाजिक कार्यकर्ता हे किंवा सेवाभावी संस्थेला पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी ,याचे भान राहिले नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामात मशगूल आहेत .वेळीच या पाणपोया सुरू झाल्या की त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि शहरातील पायी चालणारे नागरीक यांना उपयोगी पडणार आहे . आगारप्रमुखांनाही विसर
गेवराईचे बस स्थानक अति भव्य असून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची बसद्वारे येथे वर्दळ असते . बस स्थानकात उतरल्यानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बस स्थानकात उभारलेल्या दोन पाणपोया शोभेच्या बाहुल्या झाल्या आहेत . या आगारास महिला अधिकारी भेटूनही त्यांनाही या गोष्टीचे भान नाही .गोरगरिबांचे, पादाचारी लोकांचे, आशीर्वाद आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर मिळवून घ्यायचे असतील तर या पाणपोया त्वरित सुरू करणे हे सामाजिक कार्यकर्त्याची कर्तव्य आहे . त्याचबरोबर मतांसाठी गावोगाव फिरून मताचा जोगवा मागणारे तथाकथित पुढारीसुद्धा या पानपोयीपासून दूर आहेत . त्यांनीही पानपोई सुरू करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे .