जामखेड शहरामध्ये पाणी टंचाई ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
जामखेड प्रतिनिधी;-जामखेड शहरात सुरू असलेल्या भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली असून तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून पाणीटंचाई बाबत तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
या बाबत जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनाऊदिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जामखेड शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जामखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु काही कायदेशिर आणि तांत्रिक बाबीचे कारण सांगून जामखेड शहराला ११ ते १२ दिवसाला व मनमानी प्रमाणे पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून मोठे हाल होत असून विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पिण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबरोबरच जामखेड शहरातील जमादारवाडी, बटेवाडी, चुंबळी, धोत्री, भूतवडा, जामवाडी, लेहणेवाडी या सात वाड्यांमध्येही भीषण पाणी टंचाई भासत आहे. दि. १३ मार्च २०२४ रोजी पंचायत समिति मधील सभागृहात पाणी टंचाई बाबत बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये तोडगा काढू असे सांगून अद्यापपर्यंत कुठलाही ठोस निर्णय प्रशासनाने घेतलेला नाही.प्रशासनाने लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व शेतकरी व महिला वर्ग यांच्या सोबत कायदा सुव्यवस्थेचा भंग न करता नगरपरिषद कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, शहाजी राळेभात, प्रकाश सदाफुले,
राजेंद्र पवार, राजेंद्र गोरे, नरेंद्र जाधव, विकास राळेभात, मोहन पवार, अमित जाधव, प्रदीप शेटे, कुंडल राळेभात,महेंद्र राळेभात, प्रवीण उगले,उमर कुरेशी, दत्तात्रय सोले,प्रशांत राळेभात, वसीम सय्यद, बाबासाहेब मगर, संभाजी राळेभात, हरिभाऊ आजबे, अमोल गिरमे, सचिन शिंदे,डॉ. चंद्रशेखर नरसाळे, चाँद तांबोळी, आण्णा मोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.