केवळ निवडणुकीपुरतं गावांमध्ये येऊन नंतर गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना “स्वराज्य” धडा शिकवेल- छत्रपती संभाजीराजे.
🔸अशोक काळकुटे | संपादक
परभणी | प्रतिनिधी.
छत्रपती संभाजीराजे हे सध्या स्वराज्य विस्तारासाठी परभणी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील गावोगावी स्वराज्याच्या शाखा उद्घाटनासाठी छत्रपती संभाजीराजे हे स्वतः गावागावांत जात आहेत. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, परभणी जिल्ह्याच्या गावागावात फिरत असताना एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे इथल्या लोकप्रतिनिधींनी नेहमी या गावांकडे दुर्लक्षच केले आहे.
आजपर्यंत एकदाही डांबरी रस्ते न झालेली अशी अनेक गावे आहेत.
केवळ निवडणुकीपुरतं या गावांमध्ये येऊन नंतर या गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या लोकप्रतिनिधींना स्वराज्य धडा शिकवेल, अशी घोषणा संभाजीराजे यांनी केली.
जनतेचे स्वराज्य वरील हे अफाट प्रेमच स्वराज्याची ताकद असून ही ताकद याच जनतेच्या विकासासाठी, उन्नतीसाठी एकवटली जाईल, असेही यावेळी संभाजीराजे म्हणाले.