औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतर विरोधात एआयएमआयएम कडून चार हजार फॉर्म
पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी – अॅड. शेख शफीक भाऊ
बीड (प्रतिनिधी) – एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सय्यद इम्तियाज जलील, कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी, राज्य सरचिटणीस सय्यद मोईन, मराठवाडा विभागाध्यक्ष फिरोज लाला यांच्या आदेशावरून औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या नामांतराविरोधात जनतेने भरून दिलेले चार हजार फॉर्म पक्षाचे जिल्हा समन्वयक सय्यद सैफ अली उर्फ लालू भैय्या यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथील जिल्हा कार्यालयात औरंगाबाद जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांच्याकडे जमा करण्यात आले. यावेळी मोहसीन इनामदार, हाजी शेख, सय्यद सफी यांची प्रमुख उपस्थिती होती.
औरंगाबाद-उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतर विषयी फक्त मुस्लिम समाजाकडूनच नाही तर अन्य समाजामधूनही मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात उमटत असून प्रत्येक जिल्ह्यातून नामांतराविरोधात मोठ्या संख्येने फॉर्म जनतेकडून भरून देण्यात आलेले आहेत. याला बीड जिल्हाही अपवाद राहिला नाही. येथूनही एआयएमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांनी नामांतराविरोधी धडाडीने किल्ला लढवला असून हजारोंच्या संख्येने नामांतर विरोधी फार्म पक्षपदाधिकाऱ्यांसह जनतेकडून जमा करून घेतले आहेत. आणि एकंदरीतच नामांतर विरोधी जमा झालेले फार्म ची संख्या पाहता नामांतर समर्थकांपेक्षा अनेक पटींनी नामांतर विरोधकांची संख्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे शासकीय-प्रशासकीय स्तरावर शासनाने जरी औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्याचे नामांतर केले असले तरी जनतेला ते मान्य नसल्याचे दिसून येत आहे. याचे पडसाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या या दोन्ही जिल्ह्याविषयी याचिकेच्या निर्णयावर नक्कीच उमटतील आणि शासनाने केलेले नामांतर शासनाला मागे घेऊन रद्द करावे लागेल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त करून जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफीक भाऊ यांनी नामांतर विरोधी फॉर्म गोळा करण्यासाठी पक्ष पदाधिकाऱ्यांसह जनतेने घेतलेली मेहनत वाखाण्याजोगी असल्याचे मनोगत ही व्यक्त केले आहे.
चौकट –
नामांतरात हिंदू-मुस्लिम तेढ नाहीच फक्त शिंदे-भाजप सरकारचा कुटील डाव – अॅड. शेख शफीक भाऊ
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतरात हिंदू-मुस्लीम यांची जातीय तेढ नाहीच तर फक्त महाराष्ट्रात सध्या असलेल्या शिंदे-भाजप यांच्या अनौरस सरकारचा कुटील डाव आहे. या दोन्ही जिल्ह्याचे नामांतर करून ते आपले राजकीय पोळ्या शेकून घेऊ पाहत आहे. परंतु जनता आता सुजाण झाली आहे. ती यांच्या या कुटील डावाला हाणून पाडणार आहे. जनतेचा कल पाहता नामांतराबद्दल शेवटच्या मंत्रिमंडळात निर्णय घेणारे शिवसेना अध्यक्ष तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सेना, वासरात लंगडी गाय शहाणी प्रमाणे वावरणाऱ्या शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि सक्षम नेतृत्वाविना सैरभैर झालेल्या काँग्रेस च्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले जाणार आहे. असे खडखडीत मतही अॅड. शेख शफीक भाऊ यांनी व्यक्त केले आहे.