धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता !
मुंबई (प्रतिनिधी ):-: पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. भाजपने संजय राऊतांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ‘नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसलिए औरंगजेबकी मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है’, असं वक्तव्य संजय राऊतांनी बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये केलं होतं. या भाषणाची सीडी भाजपने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचरसंहितेचं उल्लंघन असल्याचं भाजपने त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे.
कलम 125 दोन समुदायात द्वेषाची भावना तयार करणे, यात 3 वर्षांचा कारावास आहे. तसंच भादंविच्या 153 अ, 153 ब आणि 499 या कलमांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन या सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांच्या निकालांचा दाखलाही तक्रारीत जोडण्यात आला आहे. तसंच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे बोलल्याने तेही या गुन्ह्यातील भागीदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी तात्काळ पंतप्रधानांची माफी मागावी, असे निर्देश द्यावेत. तसंच संजय राऊत यांच्यावर तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. या पत्रावर अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे आणि संजय मयुख या भाजप नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.