कोरोना रुग्ण वाढल्यामुळे लातूरमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागु.
🔸अशोक काळकुटे | संपादक
लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्यामुळे लातुरच्या प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (१५ मार्च) लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दींमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
तसे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत. हा कर्फ्यु रात्री ०८ ते पहाटे ०५ पर्यंत असेल. तसेच येत्या ३१ मार्चपर्यंत आठवडी बाजार देखील पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
रात्री ०८ ते पहाटे ०५ पर्यंत कर्फ्यु.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे येथील जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी रात्रीची संचारबंदी जाहीर केली आहे. जारी केलेल्या आदेशाप्रमाणे लातूरमध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतच्या तीन किलोमिटरच्या परिसरात रात्री ०८ ते पहाटे ०५ पर्यंत संचारबंदीचा आदेश लागू असेल. तसेच ३१ मार्चपर्यंत सर्व आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान या भागात सर्व अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. तसेच या भागात धार्मिक विधींना केवळ पाच लोकांना उपस्थित राहता येणार आहे. लग्नकार्यासाठीसुद्धा ५० पेक्षा जास्त लोक जमल्यास कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. धार्मिक कार्यक्रम, मोर्चे, आंदोलने अशा कार्यक्रमांना पुढील आदेशापर्यंत बंदी असेल.