धनंजय कुलकर्णी-उपसंपादक,दै.महाराष्ट्र सूर्योदय
आष्टी ते मुंबई रेल्वे फेब्रुवारी महिन्यात धावण्याची शक्यता…!
आष्टी(प्रतिनिधी) :- नगर-बीड–परळी या रेल्वेमार्गाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नगर ते आष्टी या लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गावर गेल्या महिन्यात हायस्पीड रेल्वेची चाचणीही यशस्वीपणे पार पडली. त्यामुळे आता रेल्वे कधी धावणार याची प्रतिक्षा जिल्हावासियांना होती. बीडकरांचे हे स्वप्न आता पूर्ण होणार असून लवकरच आष्टी ते मुंबई रेल्वे धावणार आहे.
नगर-बीड-परळे रेल्वेमार्गाचे अंतर 261 किलोमीटर असून 1995 साली या रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली. मात्र, त्यानंतर विविध कारणांनी हे काम रखडले. नगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण होऊन गेल्या महिन्यात या अंतरावर हायस्पीट रेल्वेची चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात आष्टी ते मुंबई नियमित रेल्वे धावणार आहे. या रेल्वेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे याच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून समजली.
उर्वरित आष्टी ते बीड-परळी या 261 किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आता चार ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान हे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच बीडकरांचे रेल्वे प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात पुर्ण होणार आहे. दरम्यान, आष्टी ते मुंबई रेल्वे सुरू होण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने आष्टी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आष्टी तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने कामधंद्यानिमित्त मुंबई येथे गेले असल्याने या भागातील जनतेचे आष्टी ते मुंबई रेल्वे प्रवासाचे अनेक दशकांचे स्वप्न पुर्ण होणार आहे.